पुणे : उद्योग, व्यवसायासह विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी करून जगभरात मराठीचा झेंडा फडकविणाऱ्या कर्तृत्ववान मराठी बांधवांच्या हजेरीने परिपूर्ण झालेल्या आणि मुलाखती, परिसंवाद, प्रदर्शन आणि कविसंमेलनाने रंगतदार बनलेल्या ‘शोध मराठी मनाचा’ या १५व्या जागतिक संमेलनाचा समारोप तीन जानेवारी २०१८ रोजी झाला. ‘जागतिक मराठी अकादमी’ने आयोजित केलेले हे तीन दिवसीय संमेलन पुणेकरांसह राज्यभरातून आलेल्या रसिकांसाठी मार्गदर्शक ठरले.
‘सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्याने नेहमीच विविध क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळण्यासाठी आपल्यासमोर आदर्श असण्याची गरज असते. या संमेलनाने अशा आदर्श व्यक्तिमत्वांची फळीच आपल्यापुढे सादर केली,’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी समारोपाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक आणि कार्यकारिणी सदस्य मधु मंगेश कर्णिक म्हणाले, ‘जीवनाला उन्नत करण्यासाठी साहित्य, संगीत आणि सर्व प्रकारच्या कला मदत करीत असतात. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी तरुणांना परदेशातील त्या त्या क्षेत्रातील दिग्गजांचे विचार आणि अनुभव एकाच छताखील ऐकण्याची संधी मिळाली.’
‘परदेशातील संमेलनांच्या निमित्ताने भटकंतीलाच जास्त प्राधान्य दिले जाते. पण परदेशातील यशस्वी मराठी बांधवांना महाराष्ट्रात आणून त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या निमित्ताने ही संकल्पना पुढे आली आहे. यंदाचे संमेलन त्यादृष्टीने उपस्थितांना प्रेरणा देण्यात यशस्वी ठरले आहे. मराठी तरुणांमध्ये हिंमत जागृत करून त्यांना जगाच्या पाठीवर सिद्ध करण्यासाठी हे संमेलन आयोजित केले जाते,’ असे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सांगितले.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) संस्थापक -अध्यक्ष हणमंतराव गायकवाड म्हणाले, ‘तीन दिवसाचे हे संमेलन संपले म्हणजे परत आता थेट पुढच्याच वर्षी हा विषय समोर येणार असे होणार नाही; तर या संमेलनाच्या निमित्ताने एक संकेतस्थळ निर्माण करून, त्यावर जगभरातील मराठी बांधव इथल्या मराठी तरुणांना मार्गदर्शन करतील. परदेशात कोणत्या क्षेत्रात काय संधी उपलब्ध आहेत, ते सांगतील. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी तरुणांच्या मनात निर्माण झालेली प्रगतीची ज्योत वर्षानुवर्षे प्रभावाने प्रज्वलित राहील, याची दक्षता निश्चितच घेतली जाईल.’
संमेलनाचे प्रमुख संयोजक सचिन ईटकर म्हणाले, ‘जगभरातील सुमारे ८० देशात मराठी बांधव राहतात आणि नोकरी, उद्योग, व्यवसाय, कला, साहित्य, विज्ञान अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. दरवर्षीच्या संमेलनात यापैकी काही मराठी बांधव आवर्जून महाराष्ट्रात येऊन इथल्या तरुणांना मार्गदर्शन करतील. अशा प्रकारे हा यज्ञ दरवर्षी नित्यनियमाने चालू राहील आणि त्यातून मिळणारे विचार आणि अनुभवांचे संचित इथल्या मराठी तरुणांना समृद्ध करतील, याची खात्री वाटते.’
संमेलनाचे कार्याध्यक्ष ‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठा’चे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी व्यासपीठावर कार्यकारिणी उपाध्यक्ष यशवंतराल गडाख व गिरीश गांधी, कोषाध्यक्ष उदय लाड, कार्यकारिणी सदस्य केसरी पाटील, मोहन गोरे, कुमार नवाथे, चंद्रकांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.